मांडकी परिसरातील उभी पिके पाण्याखाली   

वाल्हे, (वार्ताहर) : पुरंदर तालुक्यातील हिरवा पट्टा म्हणून ओळखल्या जाणार्‍या मांडकी परिसरात मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतामधील उभी पिके चक्क पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
मांडकीसह जेऊर, गुळूंचे, राख, कर्नलवाडी, नीरा, पिंपरे आदी भागात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाची संततधार सुरूच आहे. यावर्षी हवामान खात्याचा अंदाज अक्षरशः चुकल्याने या भागातील शेतकर्‍यांच्या शेती कामाचे नियोजन पुरते कोलमडले आहे. त्यातच अवकाळी पाऊस विश्रांतीच घेत नसल्याने मांडकी पट्ट्यातील ठिक ठिकाणच्या शेत जमिनीत प्रचंड प्रमाणावर पाणी साठले आहे. परिणामी शेतातील टोमॅटो तसेच घेवडा, कांदा, कोथिंबीर, भुईमूग, मका, कडवळ, ऊस आदी पिके पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकांना धोका निर्माण होऊन पिके सडण्याच्या स्थितीत आहेत. 
 
यावेळी मांडकी परिसरात २५० एकरमध्ये टोमॅटो १८ एकरमध्ये घेवडा तसेच उर्वरित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस व कांद्याची देखील लागवड झाली आहे. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर पिकांचे प्रचंड नुकसान होणार असल्याचे मत येथील प्रगतशील शेतकरी श्रीकांत जगताप यांनी व्यक्त केले.

Related Articles